पुणे, मुंबई (प्रतिनिधी) : ‘मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता. अपक्षांची मते विरोधकांना मिळाली.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. आपल्यासाठी हा निकाल अनपेक्षित नव्हता. राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि उद्धव ठाकरेंनी ती रिस्क घेतली. असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहाव्या चौथ्या उमेदवारासोबत दगा फटका झाला आहे. हा दगा फटका अपक्ष आमदारांकडून झाला असल्याचे पवारांनी म्हटले आहे. तसेच या संपूर्ण निकालाबाबत शरद पवार यांनी आपली नेमकी काय बाजू आहे ती देखील मांडली आहे.
जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना माणसे आपलीशी करणे जमाते. विविध मार्गाने.. त्या मार्गात त्यांना यश आले.’ असे म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले आहे. भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. आता राहिला अपक्षांचा प्रश्न तर त्यात काही गोष्टी झाल्या आहेत.’ असं सांगत शरद पवारांनी सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आयोगावर दबाव टाकून विजय : राऊत
राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला आणि विशेषत: शिवसेनेला अत्यंत अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपने आपला तिसरा उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले आहे; मात्र असे असले तरीही शिवसेना खासदार संजय राऊत हे मात्र हा भाजपचा विजय नसल्याचे म्हणत आहेत. भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकून हा विजय मॅनेज केला असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. ‘भाजपने नक्कीच जागा जिंकली पण त्यांचा विजय झाला असे मी मानत नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मत ही संजय पवारांना होती. किती होती तर ३३ पहिल्या पसंतीची… २६ किंवा २७ मते महाडिकांना पडली. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर त्यांचा विजय झाला. हे मान्य आहे. पण मोठा विजय झाला वगैरे हे जे काही चित्र निर्माण केले तसे नाही.
पहिल्या फेरीत संजय पवारांना ३३ आणि धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली होती. अपक्षातील सहा मते आम्हाला मिळाली, पण काही घोडे विकले गेले आहेत. कारण बाजारात जास्त बोली लागली असेल’, असा आरोप राऊतांनी केला आहे. आम्ही व्यापार केला नाही, ज्यांनी दगाबाजी केली त्यांची नावे आमच्याकडे आहेत. सुहास कांदे यांचे मत का बाद केले हा संशोधनाचा विषय असे म्हणत त्यांनी सुधीर मुनंगटीवार यांच्या मताला आक्षेप घेणार आहोत, असे सांगितले आहे.