मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. सहाव्या जागेवर देखील महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होऊन राज्यसभेवर जाईल. या निवडणुकीत भाजपने उगीचच पैसा वाया घालवू नये. पैसे असतील तर सामाजिक कार्यासाठी वापरावे, अशी खोचक टीका शिवसेनेचे खा. संजय राऊतांनी भाजपवर केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन आले. उमेदवारी मागे घेण्यावर बरीच चर्चा झाली. दोन्हीकडील नेते निवडणूक लढवाण्यावर ठाम राहिल्यामुळे कोणीच कोणाला रोखू शकत नाही. आम्ही देखील तेवढ्याच ताकदीने राज्यसभेच्या निवडणुकीत उतरलो आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, प्रश्न राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आहे. सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष हे अपक्ष किंवा इतर पक्षांवर अबलंबून आहे. भाजप या पक्षाच्या आमदारांना आमिष दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार, हा दबाव कशाप्रकारे टाकण्यात येतो याची माहिती आमच्याकडे रोज येत आहे. ज्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे ते आमचे मित्र आहे ते आम्हाला सर्व काही सांगतात, असेही ते म्हणाले.