कागल (प्रतिनिधी) :  राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघ व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचे वतीने १८ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भेट दिली. तसेच त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले.

यावेळी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करणे, कृषी विद्यापीठातील राहिलेल्या ७९६ पदांना सातवा वेतन आयोग लागू करणे, ५८ महिन्याच्या वेतन फरकासह अन्य राज्य शासनाशी निगडित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. तसेच शासनस्तरावर हा विषय मांडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली.

यावेळी घाटगे यांनी, या प्रलंबित मागण्यांबाबत स्वतः विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळवून देईन, असे आश्वासन दिले.

यावेळी अजय देशमुख, संदीप शिरवाडकर, प्रभाकर धर्माधीकारी, मिलिंद भोसले, आनंदराव खामकर, प्रशांत साळुंखे, राम तुपे, विशांत भोसले आदी उपस्थित होते.