कोल्हापूर (प्रतिनिधी) :  विधान परिषदेची निवडणूकीसाठी भाजपाचे अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमल महाडिक यांच्या विजयाचे गणित सांगून जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. ते इचलकरंजी येथे विधान परिषदेसाठी घेण्यात आलेल्या आवाडे गटाच्या मेळाव्यावेळी आज (शुक्रवार) बोलत होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सतेज पाटलांनी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याकडे २७० च्या आसपास मतदार असल्याचा दावा केला आहे. हा दावा पोकळ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येकजण आपणच जिंकणार असा दावा करणारच असल्यामुळे सतेज पाटलांना सुद्धा २७० ऐवजी त्यांना ४१६ म्हणायचे असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.  केवळ काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक आलेले ३५ जण आहेत. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र केली तर त्यांचा आकडा ११८ वर पोहोचतो.

जर भाजपचा विचार केला तर फक्त भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक आलेले १०५ आहेत. त्यात जर विनय कोरेंच्या जनसुराज्य आणि आवाडे यांच्या ताराराणी आघाडीची मते जोडली तर ती १६५ होतात. त्यामुळे त्यांच्यापेक्षाही अधिक मते आपल्याकडे आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी पुढे आणखी जेवढी मते लागणार आहेत आणि ती कोण घेणार ? यावर ही निवडणूक अवलंबून असल्याचे पाटील म्हणाले. २०८ मते मिळविणारे निवडणुकीत जिंकणार आहेत. मात्र, आम्हाला आता १६५ च्या वर केवळ ४३ इतकीच मते मिळवायची आहेत. मात्र, ही ४३ च्या मते आम्ही कशी मिळवणार हे आम्ही आता सांगणार नाही. या निवडणुकीत अमल महाडिकांचा विजय होणार याबाबत कोणतीही शंका नसल्याचा दावाही पाटील यांनी केला.

तर शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपसोबत नसते. महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा इतर कोणत्याच निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपसोबत नसते, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी सेनेवर केला.