कोल्हापूर (प्रतिनिधी) : हवामान विभागाने यंदा ११० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. ते आज (शनिवार) जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात संभाव्य पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठकीत बोलत होते.  

ना. पाटील म्हणाले की, पूरस्थितीचा फटका ज्या गावांना सर्वाधिक बसला आहे अशा गावांची संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच जी गावे स्थलांतरीत करावी लागतात अशा गावांवर लक्ष केंद्रीत करुन तेथील नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, बोटी सज्ज ठेवाव्यात. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणीसाठी प्रशासनाने जागा शोधावी. ही जागा शोधत असताना दुर्गम तालुक्यांना प्राधान्य देण्यात यावे. आपत्तीसाठी लागणारे मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पूरस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या गावांचा आढावा प्रशासनाने घेतला असल्याची माहिती दिली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.