कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारने रविवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू करण्यास प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली. त्यामुळे सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच असा निर्धार केलेल्या ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’ने आज (सोमवार) आंदोलनाऐवजी आनंदोत्सव साजरा केला. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक उपायांची माहिती देण्यासाठी रॅलीचे आयोजन केले.

लॉकडाऊनचे अन्यायी निर्बंध शिथिल करून तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर व्यापार सुरू करण्यास मिळालेली परवानगी कायम रहावी यासाठी व्यापारी व ग्राहक दोन्ही घटक स्वयंशिस्त पाळतील व व्यापार कायम सुरू ठेवतील, असा विश्‍वास राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.

राजारामपुरीतील महिला उद्योजिका सौ. रक्षा राऊत यांच्या हस्ते जनता बझार चौकात केक कापून  आनंदोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी असोसिएशनतर्फे व्यापार्‍यांना ‘मास्क नाही – प्रवेश नाही’ या अभियानाचे स्टीकर्स व बॅनर्स देण्यात आले. तसेच रॅलीद्वारे कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ललित गांधी यांनी व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळण्याकामी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त कादंबरी बलकवडे तसेच सर्व प्रसारमाध्यमांना धन्यवाद दिले.

यावेळी उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सेक्रेटरी रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजानीस अनिल पिंजाणी यांचेसह व्यापारी उपस्थित होते.