मुंबई (प्रतिनिधी) : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे. आज (सोमवार) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपच्या आशिष शेलार, अतुल भातखळकर, गिरीश महाजन यांचेसह १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की, भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर संसदीय मंत्री अनिल परब यांनी १२ आमदार निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.

यात संजय कुटे, आशिष शेलार, हरीश पिंपळे, योगेश सागर, गिरीश महाजन, पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, नारायण कुचे, बंटी बंगडीया, हरीश पिंपळे, राम सातपुते या आमदारांचा समावेश आहे. हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर फडणवीस यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे म्हणत सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातला.

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. हंगामी सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यानंतर भाजपचे डझनभर आमदार निलंबित करण्याचा निर्णय घेतला.